देवाच मिळालेलं दान म्हणजे आपल 'आयुष्य' ! खर तर एखाद्या कळीला एका लहान मुलीने जपावे तेवढ आपण आपल्या आयुष्याला जपत असतो. या कळीने आपल्याच बरोबर वाढावे फुलावे ही स्वार्थी इच्छा म्हणजे मानवाच्या जगण्याचा आधारस्तंभ आहे . आपल्याच आयुष्याच्या मोहात आपण इतके रुतून जातो की त्याला लागणारा प्रत्येक धक्का प्रत्येक ठेच मनावर जबरदस्त घाव करून जाते. आणि जखमांच्या गर्भात प्रतिशोध दडलेला असतो. कधी या जखमांना औषध मिळत ... काळाच्या रूपात. पण जेव्हा जखम फक्त ठणकत रहाते तेव्हाही आपण या काळाला दोष देतो . मग हा काळ , एका साधूचा वेश घेतलेला 'भोंदू' बनून समोर येतो जो आपल्याला फक्त फसवत असतो !... आणि तरीही शेवटी त्याच्याच पायावर डोक टेकायला लागत हाही दैवदुर्विलास नाही का ?!
जाणून सर्व काही ऐहीकाचा अभोगी ,
स्वतः च स्वतः ची महती सांगणारा
मूक पावलांचा महाजोगी
लोकांच म्हणण आहे हे ,
पाहिलं मीही तुला तसं वागताना ,
आणि आज दिसलास मला
तू माझ्या प्रारब्धावर हसताना
ना जाणो रक्त किती स्वप्नांचे
तुझ्या कमंडलुत असेल !
कित्येक मनांचे भस्म
तुझ्या अंगावर साचत असेल !
सांगत फिरतोस तू
तुला बंध ना नात्यांचे ना भावनांचे ,
ना सुतक दुःखांचे
ना सोयर कुणाच्या आनंदाचे
मी जाणले आहे तुझे खोटेपण
तुझ्या स्मितामागचे क्रूर आभास ,
होय क्रूरच म्हणीन मी, नाहीतर ..
कोण्या बुडत्यावर तू हसला नसतास
भगवंताने दिली तुला चक्र ,
आमचे आयुष्य हाकण्यासाठी
कधी उतरून बघ त्यावरून मागे ,
जीव चिरडले आहेत तरी किती
खेळ तुझा नेहमीचा, लांब हाताने फटके
तर आशीर्वाद थोटक्या हाताने
तू लादलेल्या पाप - पुण्यांचे मोजमाप
मात्र तुझ्या जपमाळेने ?!
तू साधू कसला ? तू तर ढोंगी ..
जखडलेस त्यांना, जे धावले स्वप्नांमागे
आणि केलेस त्यांना, तुझ्या होमात स्वाहा
तरीही त्यांच्या चितांवर रडणारे
म्हणत राहतात
कालाय तस्मै नमः ... कालाय तस्मै नमः !
हे जरी खर असलं तरी माझ भावनाकाहूर मन, त्याच्या प्रश्नांना उत्तरं मागत असत. अशा वेळी माणसाला हे जाहीर कराव लागत की तो नास्तिक नाही ! एकदा आस्तिक झाल की सगळ देवावर सोपवायला मोकळीक मिळून जाते. तरीही काही झाडे वादळाला झुंजायला तयार होतात, उभी राहतात. काही झाडांच्या फांद्या तुटतात , काहींची फुले वाहून जातात तरीही झाडं उभी रहातात ...पण काही झाडांच्या मुळांनाच धक्का बसतो. तेव्हा आस्तिकतेची ढाल घेऊन देवापुढे हात पसरण्यावाचून काहीच उरत नाही ...
कोणी काही मागण रोजचं आहे ,
कधी भक्तीने कधी
निरुपायाने रडण रोजचं आहे
मागणाऱ्याला नसली तरी
देणाऱ्याला तरी लाज असावी ,
गतजन्मी राहून गेल जे काही
त्याची तरी जाण असावी
हरवतात सारे
शोधता तुला भावविश्वात
क्षणा क्षणांच्या वेदनांना
मानून घेतात प्रसाद
मी कसा मागू काही
लूटलीस तू पवित्रता द्रौपदीच्या पदराची
अन झाकालीस तिला तू
करून ढाल तिला तिच्याच युद्धाची
खेळ तुझे , नियम तुझे
प्यादी तुझी आणि पट ही तुझे
नेहमीच तुला जिंकवणारे
'नशीब' नावाचे कट ही तुझे
भक्त नाही आम्ही तुझे
तू ठरवलेले
पण यातनां आहेत आम्हालाही
हाकेला आमच्या अशी
पाठ फिरवू नकोस ,
तुझ्या दारावर पुन्हा
आलाच 'बावळा' कोणी
त्यालाही
रिकाम्या हाती पाठवू नकोस !
देवाकडे केलेलं मागण म्हणजे सरकारी साहेबाला केलेला अर्जच ! सगळ्यांना वाटत की त्यांच मागण महत्वाच आहे ... स्वार्थाचा चष्मा थोडा वेळ बाजूला केला तर गीतेतला एक दृष्टांत दिसू लागतो , तो म्हणजे प्रत्येक जीवाचा जन्म एका निश्चित कर्मासाठी झालेला आहे. हे कर्म झाले नाही तर मोक्ष मिळत नाही या भीतीपोटी माणूस आत्महत्या टाळत असतो. याच भीतीपोटी तो आपापले एक ध्येय ठरवतो आणि तेच त्याचे कर्म होते. तरीही जगात दुःख आहेच , तरीही जगात अश्रू आहेत यातना आहेत. कारण माणसाने ठरवलेले त्याचे तथाकथीत कर्म आणि त्याच्या जन्माचे सार्थक यात बराच फरक असतो ...
नंतर चिखल झालेला असतो
आणि त्यातच पवित्र कमळाचे मूळ रुतलेले असते
आशीर्वाद नभाचा कोसळतो
शतजन्मांची तहान जणू शमते
तहानेमध्येच कोठे एक गाव वाहून गेलेले असते
देवावर भक्ती असावी माणसाची
नव्हे असलीच पाहिजे नाहीतर
दोन गोड शब्दांमुळे साऱ्यांचे 'देव' झाले असते
रक्ताच्या रंगात फरक नसला
तरी जखमांमध्ये फरक आहेना
फरक हा नसता तर सारे धन्वंतरी झाले असते
आरंभ हाच अंत हे गणित
मरण पाहिजे पुढच्या जन्मासाठी
नाहीतर कोणी यांच्या चक्रात अडकले नसते
वासनेची नखे गर्भात मिळाली नव्हती
तो गर्भ जळायला हवा होता
निदान त्या मृत्यूचे तरी 'सार्थक' झाले असते !
मी जर जन्म आणि मृत्यू यांच बोलू लागलो तर लोकं म्हणतील गतजन्म आणि पुनर्जन्मावर आमचा विश्वास नाही. हे सगळे माणसाच्या मनाचे खेळ !... पण माणसाचं मन खरच कुणाला उलगडलय का हो ?! माणसाचं मन म्हणजे एक साध सरळ आणि सोप चक्रव्यूह आहे. मनात अडकून पडलेला माणूस असो किंवा माणसात गुंतलेल मन असू दे , त्याचे स्वतः चे काही ठरलेले खेळ किंवा पोरखेळ असतात. त्याचे हट्ट तर त्याहून विचित्र ! आयुष्याचा मोह सुटता सुटत नाही आणि एकांत वेळी कधी संध्याकाळी या मनात एक राधा घर करून बसते. कृष्णाची वाट ती ओढीने पहातही असेल पण या जन्म मृत्यूत अडकलेल्या सामान्य जीवांना आपल्याच जगण्याच ऋण वाटू लागत. तेव्हा वाटत की भगवंताने आपल्या पावेसकट यावे आणि चिंब करून टाकावे अवघे जीवन ! त्याचेच दिलेले ऋण त्यानेच जणू फेडावे ... किंवा ते ऋण फेडणाऱ्याला भगवंत मानावे ... कदाचित म्हणूनच राधा ... ?
मेघांची हळुवार हितगुज , आहे सुरु कशाशी ?
विहिरीचे गहिरे पाणी , मातीतून झिरपून जाते
थकल्या मळक्या पंखांना , मोत्यांनी भिजवून जाते
निजू लागल्या सावल्या , झुडुपांमध्ये का खळबळ ?
दरीतून रात्रीच्या आल्या , गर्द सर्पांची का सळसळ ?
ती ज्योत थांबली होती , देवळात निजण्यासाठी
अश्रुंचे फुटले बांध , ते चरण भिजवण्यासाठी
मनाच्या बंद घराचे , वाजले अचानक दार
पायरीवरल्या पावेचा , त्या 'राधेला' आधार
त्या बंद खिडकिंवाटे, उघडले डोळे मनाचे
दाटून आले घाईने , ते उर 'कृष्ण' घनाचे !
एकदा एखादी गोष्ट भावली की ती बदलू नये असं वाटण यात मात्र माणसाचा स्वार्थ नसतो ... ती एक भीती असते कारण तीच गोष्ट जर निराळच वस्त्र , चेहरा घेऊन आली तर त्याचे स्वागत कसे करावे कळत नाही. कदाचित ते नवीन रूप स्वागत करण्याजोग ही नसू शकत ! तेव्हा असं वाटत की मोहक संध्येची सवय का झाली मला ? या सवयीमुळे मला संध्यावेडा करून टाकलंय. त्यामुळे जेव्हा मला या संध्याकाळी एकाकी वाटू लागत तेव्हा मन या भीतीने उद्विग्न होत की आजची ही संध्याकाळ रम्य नसून तो दिवसाचा अंत आहे ... एकांतात डोळ्यासमोर घडणार सार अघटीत वाटू लागत , रातराणीचं बहरण विरह गाण वाटू लागत आणि दवबिंदुंचे अश्रू !... याच वेळी मेघ जर कधी दाटून आले तर मनात एक विचित्र अंधार पडतो , एक विचित्र शांतता पसरते . आज हे मेघ सार सार वाहून नेणार अशी एक भीती वाटू लागते... त्याच्या आधी आपणच रडून घ्यावस वाटत पण या प्रश्नोत्तरांवर आधारलेल्या जगात मिसळण्यासाठी मूक आक्रोश करावा लागतो... तेव्हा मात्र हे 'संध्याचर' पण तो एकांत सगळ नकोसं वाटू लागत ..
कावळ्यांची जमली टोळी ,
दिसला असेल त्यांना
चालताना चंद्रमौळी
कावकाव त्यांची येते
अंत्यगीत गातागाता ,
पदर रे केशरी ढळला
दिनकराचे गीत गाता
आणि मृत्युच्या भयाने
सूर्य लपला पृथ्विमागे,
घनगर्द मेघांचे तांडव
क्षितिजावर झाले जागे
रातराणीचे विरहगाणे
उमलेल फांदीवरती ,
अश्रुंचे दवबिंदू
गवताच्या पातींवरती
माथे टेकले दिवसाने
दारावर चांदण्याच्या ,
उधळून आल्या नभी
माला तारकाफुलांच्या
असला नको रे एकांत
असला नको दिवस दिनकर
असला नको रातवारा
असला नको मी संध्याचर
कलाकाराला मिळणारा एकांत म्हणजे एक दुधारी तलवार असते .. तो एक मोहपाश असतो ज्याचा मोह सुटत नाही आणि एकदा अडकलो की पुन्हा भौतिक जगात यावस वाटत नाही. एकांत म्हणजे फक्त आजूबाजूला कोणी नसणे नव्हे ही तर एक मनाची अवस्था असते जेव्हा माणूस अंतर्मुख होत असतो. या एकांताची कारण शोधायची असतील तर आधी मनात वाकून पहाव लागेल. मनाने गुंफलेल्या भावनांच्या प्रत्येक नाजूक गजऱ्यात कुणाचा तरी गंध वसलेला असतो. कदाचित म्हणूनच माणसं दूर गेली तरी त्यांच्या आठवणी दरवळत रहातात. असाच एखादा प्रेमाच्या धाग्याने ओवलेला गजरा कोणी जर मोकळा केला तर तो दूर जातानाही आपला गंध आपल्या पाकळ्या वाटेवर सांडत जातो .. मग एकांतात हरवलेल्याला त्या वाटेवर चालण्यावाचून मनाला काहीच सुचत नाही..
मन माझे भरकटलेले ,
अंगण मात्र शांत,
अबोल, पाणावलेले
घरटेही आता स्तब्ध
काड्याच उरल्या मागे ,
फुले सुकलेली त्यावर
काळाचे रेशमी धागे ,
टिकून आहे मात्र
फांदीवर नाव कोरलेले
तू गेलीस त्या वाटेवर ...
गंध तुझा कधी
हा वारा हिरावून नेतो ,
आभास माझा कधी
तुलाच घेऊन येतो ,
भिंतीवरचे चित्र तुझे
सावल्यांनी झाकलेले
तू गेलीस त्या वाटेवर ...
देव्हाऱ्यात अजून आहे
दिवा तू लावलेला ,
ज्योतीसम मात्र मी
एकटाच चेतलेला ,
मागू मी काय त्याला
त्यानेच सारे नेले
तू गेलीस त्या वाटेवर ...
आता न उरली रात्र
न चांदण्याचे हसणे ,
न एकांत सुखावलेला
न तुझे लाजणे ,
मोजत जातो आता
क्षण माझे विस्कटलेले
तू गेलीस त्या वाटेवर ...
किरणे बसतात कधी
पायरीवर उदास ,
कधी घरावर सखे
झुकून येत आकाश ,
झाड उभे एक वेडे
विजेवर भारलेले
तू गेलीस त्या वाटेवर ...
सांगायचं होत काही
ऐकायचं होत काही ,
शपथांना तू दिलेल्या
मी विसरलो नाही ,
आता मागे फक्त
शब्द .. शब्द .. शब्दच उरलेले
तू गेलीस त्या वाटेवर ...
प्रेमाच्या पाकळ्या वेचत वेचत माणूस कुणाचा तरी माग काढत ज्या रस्त्यांवरून चालत असतो , ते रस्ते तसे नागमोडी वळणांचे ... ओंजळीत साठवलेल्या पाकळ्या हळू हळू सुकून जाऊ लागतात आणि त्यांच्या गंधांच्या आठवणी होऊ लागतात. या तथाकथित प्रेमाच्या अनिश्चित वाटांवर चालताना एका सहचारिणीचा विसर पडलेला असतो ती म्हणजे वेळ. पावलागणिक लांब आणि धूसर होत जाणाऱ्यां रस्त्यांना फाटे फोडण्याच काम ही वेळ करते. माणसाला चालण्याची इतकी सवय होते की तो रस्त्याचा एक घटकच बनून जातो आणि त्याला फाटे आणि वळणांच भान रहात नाही. मग कोणत्यातरी एका वळणावर उमगत की हे चुकीच वळण आहे पण तेव्हा उशीर झालेला असतो ... बरीच वळणे चुकीची झालेली असतात. आठवणी साचून साचून मनाची अडगळ झालेली असते आणि त्यातच तो प्रत्येक चुकलेल्या वळणाचा हिशोब मांडू लागतो. कारण अजूनही त्याची स्वप्न बघायची उर्मी संपलेली नसते आणि मागे उरलेल्या असतात काही वाटा, आठवणीत ओथंबलेले काही क्षण आणि काही श्वास ...
चुरगळलेल्या वहीत माझ्या हिशोब मांडत होतो .
अडगळीत होते सूर काही , तुजसाठी आसुसलेले
शब्दही हरवलेले आणि अश्रुंत विरघळलेले
एकाकी भरकटलेले , माझेच गाणे गात होतो
त्या विरल्या गोड क्षणांना ...
तुझ्या कोमल स्पर्शांना , अंधार झाकून होता
जपून ठेवलेला चंद्र मी, धूळ पांघरून होता
हवेत धुंद तुझे हसणे.. आणि मी रडत होतो
त्या विरल्या गोड क्षणांना ...
तू सांग मला सखेगं, वेदनांचे काय करू मी
नभ दाटल्या मनाच्या, प्रश्नांचे काय करू मी
वेडावलेला असा मी, मलाच बोलत होतो
त्या विरल्या गोड क्षणांना ...
प्रश्न ओघळले जणू की नदीने बांध फोडावे
उदास होतो मी की , ज्योतीने डोळे मिटावे
तुटल्या आयुष्याचे, मी तुकडे वेचत होतो
त्या विरल्या गोड क्षणांना ...
आक्रोश हा मौनाचा , भिंतींना तोडून जातो
अन अंगणात माझ्या, प्राजक्त दाटून येतो
खिडकीत उभा, फसव्या वाटांना पाहत होतो
त्या विरल्या गोड क्षणांना ...
किती सांगू मी मनाला ,तोही ऐकत नाही
त्या नाजूक पावलांना , अजून विसरत नाही
कासाविस झाल्या श्वासांना मोजत होतो
त्या विरल्या गोड क्षणांना ...
हिशेब ही सुद्धा अजून एक अशीच मजेशीर गोष्ट ! कारण हिशेबाचा संबंध गणिताशी येतो एका अस्सल भौतिक विश्वाशी येतो. या जगात दोन अधिक दोन चारच होतात , ते जर झाले नाहीत तर हिशेब चुकला हे अगदी नक्की. आयुष्याचा हिशेबासाठी चालू असलेली जुळवाजुळव म्हणजे थोडक्यात आनंदाच्या क्षणांतून दुःखांच्या क्षणांची वजाबाकी. बहुतेकांच्या नशिबात या हिशेबाची बाकी शून्य असते. थोडक्यात आपल्या लोकांपासून आपण खूप दूर आलेलो असतो किंवा आपलेच लोकं आपल्याला सोडून गेलेली असतात. या विरहाची कारणमीमांसा गणितात मांडता येणारी नसते. तेव्हा माणूस त्या दूर गेलेल्याची आठवण काढू लागतो मनातल्या मनात बोलावू लागतो . कधी कधी अगदी अखेरच्या श्वासापर्यंत ..
कधी जमलंच तर परत ये ,
तू दिलेले शब्द मी
ठेवलेत जपून काही
भातुकलीचे घरटे
तुझे माझे शेणाचे, मेणाचे ,
त्या घरट्याचे तुकडे
ठेवलेत जपून काही
रुसण्याचे खेळ तुझे
दोन गडी पण राज्य माझे ,
तुला हसवण्याचे क्षण
बसलेत रुतून काही
वर पाहतो मी आता
चंद्र निस्तेज अबोल दिसतो ,
जणू स्पर्शाच्या चांदण्याला
गेलेत विसरून काही
वाट पाहण्यासाठी
आता काळही साद देत नाही ,
आपल्या भेटीसाठी श्वास
ठेवलेत राखून काही...
काही गोष्टींना खरच "वय" नसत !
माझ्या भावनाच्या काही विचित्र अवस्था आहेत... आधी प्रश्न, मग त्याच उत्तरं शोधण्याची धडपड, मग थोडे मी आणि थोडे लोकांनी उभे केलेले अडथळे, त्यावर येणारा राग, फार राग येऊन होणारा निरुपाय , निरुपायाने ओढवलेली शांतता आणि कालांतराने प्रश्नच निष्फळ वाटू लागल्यामुळे येणार करुणात्मक हसू . आणि एकदा एखाद्या गोष्टीच हसं झाल की त्याकडे मी त्रयस्थ पणे बघतो आणि खरा प्रश्न समोर येतो की 'ते' काय होत ? मी कशाचा पाठलाग करत होतो ? आईनस्टाइन म्हणून गेलाय की उत्तरं शोधण्यासाठी आधी प्रश्न बरोबर माहित असणं गरजेच आहे. उशिरा का होईना मी प्रश्न बरोबर मांडतोच आणि एखाद्या विजेसारख उत्तरं समोर येत ... जणू वहीत दडवून ठेवलेल्या काळ्यांचा एके दिवशी अचानक सुवास दरवळावा !
विचारत नसत
पावसाच्या थेंबांना
'जे 'माहित नसत
पृथ्वीला गवसणारे
इंद्रधनुष्य 'जे' सांगत नसत
चांदण ओंजळीत घेणाऱ्या
रातराणीला 'जे' ठाऊक नसत
कुठल्या ओढीने जाणाऱ्या
नदीत 'जे' वहात नसत
वसंत फुलल्या वेलींवर
'जे' उमलत नसत
फूल फुलपाखराला
'जे' मागत नसत
वाट पाहणाऱ्या डोळ्यांना
'जे' दिसत नसत
विरहाच्या अश्रूंना 'जे'
कळत नसत
सांगून कधी 'जे'
ऐकू येत नसत
कधी न सांगताही
'जे' उमगत असत
भावनाच्या पंखांना कधीच
'या'च बंधन नसत
ज्यांना 'हे' कळणार नाही
त्यांना कधीच पटत नसत
तू दिलेल्या कळ्या
जपून ठेवल्यात मी अजूनही
इतकी वर्ष झाली
पण त्यांच्या सुगंधाला
याच भय नसत
काही गोष्टींना खरच "वय" नसत !
माझी ही उत्तरं शोधण्याची प्रक्रिया जरी परिचयाची असली तरी ती सोसायला सोपी नव्हे. पण याचा भौतिक जगात काहीही उपयोग नसतो कारण माझ्या उमेदीचा काळ निघून गेलेला असतो, आपल मनाच समाधान ... इतकंच. नुसत्या मनाच्या समाधानावर पुन्हा एकदा उमेदीने शोध सुरु करणं म्हणजे तसं कठीणच ! तेव्हा माझ्यातच एक नवीन मूक संघर्ष सुरु होतो , एका बाजूला माझ मन आणि एका बाजूला माझ शरीर उभं असत. या दोघांचा मेल घालण म्हणजे महाकठीण ! म्हणूनच कदाचित मी या मन मिळवणीच्या फंदात पडत नाही. सगळ्या वस्तूंच्या प्रतिमा तयार होतात ... आयुष्य एक मृगजळ वाटायला लागत. आणि चुकून मनाने या मृगजळावर विश्वास ठेवायला सुरुवात केली की मात्र शरीर अगदी थकून जात. स्वप्न आणि सत्य यांच्या वाटा म्हणजे चकाव्यांच एक जाळच ..
तो मुकला होता थोडा
स्वप्न पाहता पाहता
तो चुकला होता थोडा
सांजवेळी त्याने कधी
हातात आणला होता
जाईचा गोंडस गजरा
तो सुकला होता थोडा
तो टाकून आला होता
रक्ताचे करून वंगण
तळाशी होता पटल जो
तो झिजला होता थोडा
आणतसे तो चंद्रही
नात्यांच्या खिडकीपाशी
पुनवेला ग्रहणावरती
तो झुकला होता थोडा
तो चालत होता जेथे
वाटाच फसव्या होत्या
चकव्यांचे होते राज्य
तो चकला होता थोडा
तृष्णेला कंठ फुटावा
मृगजळे उदंड व्हावी
भासांना गिळण्यासाठी
तो वाकला होता थोडा
त्या मृगजळात होते
प्रतिबिंब ओळखीचे
गहिवरून आले मजला
तो हसला होता थोडा
ते सत्य प्रतिबिंब होते
की विस्मृतीत गेलो 'मी' ?
कोड्यांचे टाकून जाळे
तो बसला होता थोडा
सावलीत माझ्या मी
एकांत शोधत होतो
माझ्या मूढ प्रश्नांना
तो थकला होता थोडा
या माझ्या चालण्या , थांबण्या अडखळण्याच्या परिक्रमेतील अजून एक पडाव म्हणजे फकिराच कोंदण लाभलेलं क्षणिक वैराग्य. खर तर वैराग्याचा अर्थ फार मोठा आहे. त्याच्या अनंत पसरलेल्या पाउलखुणांवर वर्षानुवर्ष साचत आलेल्या अध्यात्मिक भस्माला माझ्या सारख्या सामान्य माणसाचा उसासा काय हलवणार ? संसारावर, आयुष्यावर प्रेम करायचं असेल तर एकदा तरी वैराग्याची भावना दाटून यावी लागते एकदा तरी फकिराचे फाटके घोंगडे अंगावार घ्यावे लागते ! थोडस बुचकळ्यात टाकणार विधान आहे पण एक मजेची गोष्ट आहे की माणसाचं मन जे त्याच्या जवळ नाही नेमक तेच मागतो. मला जेव्हा कळत नाही की मला नक्की काय हवंय तेव्हा मी हे फकीर पण अंगावर घेतो. आणि एकदा फकीर होऊन वावरायला लागलो की आपल्याच आयुष्याकडे त्रयस्थ पणे बघण्याची ताकद मला मिळते. तेव्हा मला जाणीव होते की माझ्याकडे नसलेल्या गोष्टींपेक्षा असलेल्या गोष्टींच मोल फार मोठ आहे ... थोडा वेळ मला ते फकिराच घोंगड घट्ट धरून ठेवावस वाटत. कारण माझ्या मनाला माहित आहे हे फकीरपण सुद्धा माझ्याकडे कायमच रहाणार नाहीये !
गळी रुद्राक्ष घालतो मी
पायी काटे असो वा पाणी ,
अनंत चालतो मी ..
जायचे कोठे माहित नाही
ना वाटांचे ज्ञान आहे ,
क्षितिजावर घर माझे
एवढेच जाणतो मी
पांघरतो उन्हाला, कधी
खेळतो चांदण्यात ,
सखी सोबती माझी
सावलीला मानतो मी
वेळेचे भान नाही
नात्यांचे बंध नाही ,
आयुष्य पावलांच्या
खुणांवर मांडतो मी
का चालतो असा मी
मलाच उमगत नाही ,
कल्लोळल्या मनाशी
सदैव भांडतो मी
कधी गाव लागला कोठे
दिसतात 'माणसे' थोडी ,
खोट्या मुखवट्याना
रस्त्यात सांडतो मी
कोणी म्हणे मी वेडा
कोणी म्हणे अडाणी ,
शब्द गिळले किती
हे कधी न स्मरतो मी
आहे जसा मी
आहे तसा मी
कुणी म्हणावे काही , स्वतः ला
"फकीर" म्हणवतो मी !
मनाची अजून एक गमतीशीर गोष्ट म्हणजे हे मन एक घन वस्तू नाही. अनंत तलम, कठोर, कधी पारदर्शक, कधी अर्ध पारदर्शक पटलांचे थर या मनात असतात. पण ही पटले म्हणजे मिटलेल्या फुलाच्या पाकळ्या नव्हे ! वेळोवेळी मन एकेक पटलाला आपल्या भोवती गुंडाळत असत आणि म्हणूनच ही पटले आणि फुलाच्या पाकळ्या यांच्यात मुलभूत फरक आहे. प्रत्येक ज्योतीला जशी कधीतरी अगदी प्राणांहून प्रखर होण्याची लालसा होते आणि ती इर्षेने फडफडू लागते तसंच थोड मनाच देखील आहे ... काही काळ वैराग्याचा पटलात लपून झाल, थोड एकाकी राहून झाल की मनात पुन्हा एकदा आयुष्य जगण्याची इर्षा निर्माण होते. याला प्रतिशोध म्हणता येणार नाही कारण याचा हेतू चांगला असतो. असं वाटत की कुठला तरी वादळ याव आणि एका झापेसरशी सार आयुष्य बदलून टाकावं. पण जशी कुठल्याही दैवदत्त गोष्टीला आपली एक गती असते त्याचप्रमाणे आयुष्यालाही एक गती असते. क्षणार्धात येणार आणि जाणार हे वादळ नेहमीच फक्त साचलेल पाणी वाहून नेईल याची हमी कोण देणार ? आणि कशावरून आपल्या आयुष्यात आपण येऊ घातलेलं वादळ दुसऱ्याच्या आयुष्याशी खेळणार नाही ..?!
तेव्हा त्याला थोपवता येत नाही
असंच एक वादळ होत ,
लपलेलं झोपलेलं घाबरलेलं
जागं झालंय आता ते
त्याला सांभाळता येत नाही
सडलेली किडलेली रोपं
जोमाने फोफावली होती ,
त्यात होती काही फुलं
आणि काही अंकुर ,
ते वादळ आलंच जर
या रानाला चिरडायला
त्याला थांबवता येत नाही
होरपळून करपून मेलेल्या
चितांचे मनही जळाले ,
कधी तेज पणत्यांचे
कधी शस्त्र मशालींचे ,
पण हा वणवा आलाच
माणस चेतवायला
त्याला आवरता येत नाही
कैक दिवसांनी जाग्या
झालेल्या वादळात
जाईल वाहून बरंच काही ,
सोन्याच्या विटांचे महाल
आणि काड्यांचे झोपडेही ,
वाहून गेलेलं गाव
वाहून गेलेलं मन ,
पुन्हा उभं करता येत नाही
हे वादळ ज्या ज्या
रस्त्यावरून जाईल
त्या रस्त्यांना
प्रशस्त करता येत नाही
हे वादळ थोपवता येत नाही !
दिवा लावला की प्रकाश पडणार ! एवढ्या साध्या आणि सुलभ व्याख्येने वादळ आणि त्याच्या परिणामांचे मुल्यांकन करता येत नाही. मनातल्या वादळांची तर गोष्टच निराळी ! मनातल वादळ म्हणजे फक्त सोसाट्याने वाहणारे विचार किंवा बेभान बरसणाऱ्या भावना नसतात. ते वादळ म्हणजे जीवनरूपी अखंड नदीचा प्रवाह बदलणारा, नैसर्गिक बांध असतो. प्रवाहात वाहताना मनाला दिशांचे भान रहात नाही. त्याला फक्त वाहण्याचीच ओढ लागलेली असते. प्रवाह या वादळामुळे अनेक वळणे घेत जातो. खडकांचे, वनांचे , दऱ्या खोऱ्याचे अडथळे पार करत धावत रहातो. कोणी याला जीवनाचं भरकटण म्हटलं तर मन उर्मट पणे त्याला प्रवाहाची दिशा असं ठणकावून सांगतं. आणि कधी कधी माणूस प्रवाहाशी शर्यत करता करता स्वतः पासून फार दूर एका विवक्षित पण तरीही असुरक्षित जागी जावून बसतो. या जागेत आणि बहिस्थ जगात फक्त एक काचेची भिंत असते. 'तो' बोलायचा थांबलेला असतो आणि आपण त्याला विचारलं जरी काही, आपला आवाज त्याच्यापर्यंत पोहोचतच नाही ... त्याचं आयुष्य अगदी पाचोळ्यासारख वाटू लागतं ...
कधीतरी तो , मला काहीतरी शोधताना दिसतो
मी त्याला विचारत नाही , असच काहीस तो हरवून बसलाय
कधी पहाटे तो देवाजवळ ,
एकटाच काहीतरी मागत असतो ,
वर्षामागून वर्ष गेली तरीही तो रडत असतो
असं खूप जवळच काही गमावून बसलाय ,
पण मी त्याला विचारत नाही
असच काहीसं तो हरवून बसलाय
काही जण म्हणतात असं , काही म्हणतात तसं
पण तो मात्र गोष्टी सांगत फिरतो ,
सुख - दुखाच्या , मनातल्या गावातल्या ..
पण आयुष्याचे शब्द वेचता वेचता
इतिहासाच फाटलेल पान होऊन बसलाय
मी त्याला विचारत नाही
असच काहीसं तो हरवून बसलाय
मला वाईट वाटायचं ..
जेव्हा तो एकटाच बसतो कधी नदीकाठी
थोडा देवावरही रागावतो ,
मग समजलं की, आयुष्याची कागदी होडी
तो त्या नदीतच सोडून बसलाय
मी तरी त्याला काय विचारू ,
असच काहीसं तो हरवून बसलाय
असं म्हणतात त्याने ऐकलं, जेव्हा सगळे बोलत होते
तो बोलायला गेला तेव्हा वेळच ऐकत नव्हती ,
मी ऐकायला गेलो, पण तो शुष्क डोळ्यांमध्ये
सारे शब्द ,सारे स्वर गिळून बसलाय ,
मी त्याला विचारात नाही ,
असच काहीसं तो हरवून बसलाय
त्या झाडावर यायची कधी फुलं
अन सावलीही होती त्याची ,
आपल्या कर्तृत्वाची गाणीही
ताठ मानेने गायचा तो कधी ,
वाऱ्याशी झुंजता झुंजता
तो फक्त 'पाचोळा' होऊन बसलाय ,
मी तरी त्याला काय विचारणार ,
असच काहीसं तो हरवून बसलाय
आजही तो दिसतो ..
मान खाली घालून चालत असतो ..
मी स्वतालाच विचारतो
जग त्याला विसरलय की,
तो ' पाचोळा ' सगळ्या रानाला वाळीत टाकून बसलाय ?
आता मात्र त्याला विचारावस वाटत नाही ,
असच काहीसं तो हरवून बसलाय ...
सुख आणि दुःख एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत .. असं थोरा मोठ्यांचं बोलणं आपण वाचतो , ऐकतो. ज्याच्यासाठी सुख-दुःखातला फरक नष्ट झाला तो स्थितप्रज्ञ हेही आपण मानलेलं आहे. पण स्थितप्रज्ञही स्वतःला आपण सुख-दुःखाला समान मानतो , असं सांगून स्थितप्रज्ञतेच एका अर्थी सुखच उपभोगत असतो ! मग हा फरक कुठे नष्ट झाला ?! याच मुख्य कारण म्हणजे सुख आणि दुःख हे मनाच्या स्वार्थाचे सफल अथवा निष्फल होण्याचे परिणाम आहेत आणि मनावर संयम म्हणजे फक्त या स्वर्थांवर ताबा ! स्वार्थासारखीच अजून एक प्रश्नांकित वस्तू म्हणजे पाप-पुण्य भावना. मनाची ठाम समजूत असते की सुख वाटल्याने पुण्य मिळतं पण कुणाचं दुःख आपल्या पदरात घेतल्यानेही पुण्य मिळतं हे मन अगदी सोयीस्कररित्या विसरत. सहसा कुठल्याच मनाला दुःख नको असतं आणि म्हणूनच काही मने हे दुःख आपल्यात सामावण्यासाठी पुढे येतात. त्या मनांनाही सुख हवं असतं पण त्यांचं प्रारब्ध वेगळंच काही लिहित असतं. अमृत कोणाला नको असतं ?! पण अमृताबरोबर जे विष येत ते प्यायला कोणी एखादा नीलकंठ लागतोचना ! या अशा मनांना तो का हसत नाही ? हे विचारणं थोडसं कृतघ्नी वाटू लागतं...
सगळ्यांचाच डोळा होता,
पण विषावर स्वामित्व सांगणारा
तो निळकंठ एकटा होता !
हसण्याला अमृत मानले ज्यांनी
तो भ्रम होता त्यांचा ,
आनंदाश्रूंनी न्हाहून गेलेला
तो काळ वेगळा होता
हसता हसता आज
गातो ज्यांची गाणी
मिरवतो पालख्याही ,
तो सिद्धार्थ ' मी ' पण
दु : खावर सोडून होता
मला विचारलंत अगदी सहजपणे ,
का मी हसत नाही ?
विचारा हेच त्या आईला
जिचा तान्हा त्या खडीवर झोपून होता
काहींना चाळशी मिळते
रंगीबेरंगी, नाना ऋतूंचे
मी ती लावली स्वताला
त्यात फक्त गडद रंग होता
मलाही हसायचंय
जर ते रंग कुणी पुसले तर ...